आई होणं ‘खरंच’ सोपं नाही... या वाक्यातल्या खरंच या शब्दावर
जोर द्यायालाच हवा. प्रत्येक आईला या 'खरंच' या शब्दाचा नेमका अर्थ समजेल. आईची घालमेल, आई झालीस की कळेल,
आई आहे शेवटी, आईला सगळं कळतं, आई होणं सोपं नाही, आईसाठी तिची
मुलं नेहमीच लहान असतात, आईचं काळीज या सगळ्या वाक्यांचा
अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा एक स्त्री एका जीवाला जन्म देते. प्रसूती होताना तिला
होणाऱ्या वेदना ती एका झटक्यात दूर करते जेव्हा तिला तिच्या बाळाच्या रडण्याचा
आवाज येतो. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने खुश होण्याचा हा तिच्यासाठीचा एकमेव क्षण ! यानंतर बाळाचं रडणं म्हणजे त्या आईसाठी चिंतेचा विषय बनतो.
आज मातृदिन...
आजवर तिने तिच्या आईला शुभेच्छा दिल्या. आता तिला शुभेच्छा देणारं कोणीतरी आलंय. जे
जे तिने आजवर एक मुलगी म्हणून अनुभवलंय ते सगळं आता तिची लेक अनुभवणार आहे. आणि जे
तिच्या आईने बघितलं ते ती स्वत: आता आई म्हणून बघणार.
आजवर तिने मारलेली ‘आई’ अशी हाक आता
कोणीतरी तिला मारणार. ही हाक आल्यावर ती कोणाला तरी ओ देणार. तिच्या लेकीने तिच्याशी हुज्जत घातली की ती तेच वाक्य तिला ऐकवणार जे तिने तिच्या आईला ऐकवलेलं असतं; 'मी तुझीच लेक आहे.. तुझ्यासारखीच असणार'. तेव्हा तिचे शब्द संपणार. हे तिच्या बालपणीचं
चित्र ती पुन्हा एकदा जगणार.
आई कसलाच हिशेब ठेवत नाही.. ना तिने तिच्या मुलांसाठी किती केलंय याचा ना त्यांना पानात किती वाढलंय याचा. 'अगं तू आधी दोन पोळ्या वाढल्या होत्यास. परत तिसरी?'
असं ते तिलाच गणित शिकवतात. पण आपल्या बळाने रोज आदल्या दिवसापेक्षा जास्त दूध प्यावं म्हणून तीच झटत असते तेव्हा त्या गणिताची उजळणी आठवल्याशिवाय राहत नाही. आपल्या पोटात
दोन घास गेल्याशिवाय आईला अन्न गोड लागत नाही. तेव्हा 'इतकं काय.. जेवून घ्यायचं ना' असं
आपण तिला सहज म्हणतो. पण जेव्हा बाळाला दूध पाजल्याशिवाय तिला जेवण
जात नाही तेव्हा त्या 'इतकं काय' चा राग येतो.
काही वेळा काही गाणी आपण त्याची चाल आवडली म्हणून गुणगुणत असतो. पण त्यातल्या ओळींचा अर्थ वयोपरत्वे समजत जातो. ‘देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू श्री माझे सारे जीवन देई मम बाळाला...’ हे जुनं गाणंही त्यापैकीच एक. त्यातल्या ओळींचा अर्थ आता खऱ्या अर्थाने कळतोय. माझं ते सगळंच्या सगळं; अगदी माझं आयुष्यच तुझं आणि तुझ्याचसाठी ! ही नवी भावना तिच्यात रुजत चाललीये आता. 'मी माझ्या बाळासाठी वाट्टेल ते करेन' हे वाक्य म्हणण्याची ताकद आई झाल्यावरच येते. तिची मुलं शिक्षण, नोकरीसाठी परशहरी, परदेशात जाणार असतात तेव्हा आईची होणारी घालमेल बघून घरातलेच तिची गंमत करतात. ‘इतकं काय त्यात’ असंही काहींना वाटतं. पण जेव्हा आई तिच्या झोपलेल्या बाळाला आतल्या खोलीत जरा वेळ सुद्धा एकट्याला सोडू शकत नाही तेव्हा आईची ती घालमेल आठवते.
बाळंतपणाला माहेरी गेल्यावर मुलगी
जेव्हा तिच्या आईला सतत 'माझ्यावेळी तू कसं
मॅनेज केलंस गं?', 'मी कशी होते',
' मी किती त्रास दिलाय', ‘मी किती जागवलंय’, 'तू
काय केलं होतंस अमुक अमुक वेळी', 'मला काही झालं की तू कशी
रिअक्ट व्हायचीस' असे प्रश्न एक मुलगी म्हणून विचारत
असली तरी त्यावेळी तिच्यात एक 'आई' तयार होत असते. तिच्यासाठी जसं एक 'माहेर' आहे तसंच आता तिच्या लेकीसाठी तिचं घर ‘माहेर’ असेल ही भावना तिच्यासाठी सुखवणारीच! 'किती आई आई करते'
असं आपण एखाद्याला किंवा एखादीला चेष्टेने म्हणतो पण आता ही हाक
ऐकायला त्या नवमातेचे कान चोवीस तास आतुर झालेले असतात.
किती आणि काय काय आपण सहज बोलून गेलेलो असतो. मागचा पुढचा विचार न
करता.. पण ते सगळं आपल्याच जवळ येऊन थंबणारं आहे, याची तेव्हा कल्पना नसते. पण त्या वेळी आपण दुसऱ्या बाजूला
असतो. समोरच्या भूमिकेत! आईच्या भूमिकेत! आणि म्हणूनच अशा वेळी 'आई' या
नव्या भूमिकेतून बघताना समस्त आई वर्गाविषयीचा आदर, प्रेम, आपुलकी आणखीच वाढते. अशा वेळी ‘काकस्पर्श’ सिनेमातलं ‘जन्म बाईचा बाईचा…’ या गाण्यातल्या शेवटच्या ओळी
आठवतात आणि तितक्याच भावतातही...
काय मी सांगू काय हे झाले..
का तुला कहाले मागणे
आले...
माय ही सांगे अर्थ मायेचा...
जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा..
एक आईचा आईचा एक ताईचा.. !